बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं शुक्रवारी(५ एप्रिल) निधन झालं. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच तब्येत बरी नसल्याने मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं.
आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा कुणाल गोस्वामीने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मनोज कुमार यांनी कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते.
मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या एबटाबाद येथे झाला होता. स्वातंत्र्यानंतर फाळणी झाल्याने मनोज कुमार यांचे कुटुंबीय भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. तेव्हा मनोज कुमार १० वर्षांचे होते. त्यांचं खरं नाव हरिकृष्ण गोस्वामी असं होतं. दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली. ते दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. म्हणूनच इंडस्ट्रीत येताना त्यांनी स्वत:चं नाव बदलून मनोज कुमार असं केलं.
१९५७ साली फॅशन सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं होतं. पण, त्यांना खरी प्रसिद्धी १९६० साली प्रदर्शित झालेल्या कांच की गुड़िया या सिनेमामुळे मिळाली होती. या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘नील कमल’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. त्यांना कलाविश्वातील कारकीर्दीसाठी १९९२ साली पद्मश्री आणि २०१५ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 05-04-2025
