◼️ क्षत्रिय मराठा मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात
रत्नागिरी : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु हे दुःखद आहे. कारण मराठ्यांनी महाराष्ट्राचे, सर्वांचे नेहमीच नेतृत्व केले आहे. ती भूमिका कायम ठेवली पाहिजे. त्यामुळे भांडणे दूर केली पाहिजेत, यातच समाजाचे हित आहे, असे आवाहन रत्नागिरी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले.
टीआरपी येथील अंबर हॉल येथे रविवारी सायंकाळी रत्नागिरी येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्या सतराव्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष राकेश नलावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, प्रचार प्रमुख संतोष तावडे आणि खजिनदार जितेंद्र विचारे उपस्थित होते.
सुरेशराव सुर्वे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. राज्य शासन मराठा विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी जागा देत आहे. तशी जागा आपण घ्यावी. लवकरच मंडळाचे दुसऱ्या जागेत ऑफिस सुरू करण्यात येणार आहे. मंडळाला दरवर्षी ५००० रुपये देणारे मानकरी ७५ आणि २००० रुपये देणारे ४० मानकरी झाले आहेत. याबद्दल या सर्वांचे आभार मानतो. आज वयाची ७५ व ९० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार केला. त्यात वरवडे गावाचे ३० वर्षे सरपंच राहिलेले भिकाजी गणपत विचारे यांचा आगळावेगळा सत्कार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तृत्व स्पर्धेचा विजेता शुभंकर विचारे याने चांगले विचार मांडले आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनीही म्हटले होते की छत्रपतींनी महाराष्ट्र धर्म जागवला. आज हा धर्म जागवण्याची गरज आहे. मंडळाच्या एकूण प्रगतीत महिला सभासदांचे योगदान आहे, त्यांना धन्यवाद देतो, असे अध्यक्ष सुर्वे म्हणाले.
कार्याध्यक्ष राकेश नलावडे यांनी सांगितले की, क्षत्रिय मराठा मंडळ किमान दोन एकरची जागेवर श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर, प्रशस्त सभागृह आणि विद्यार्थी वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्न करत आहे. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने हे काम पूर्ण होईल.
याप्रसंगी प्रचारप्रमुख संतोष तावडे म्हणाले की, क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्यालय अनेक वर्षे सुरू आहे. शहराजवळ मंडळासाठी स्वमालकीची नवीन जागा शोधत आहोत. क्षत्रिय मराठा मंडळाने मराठा बंधू- भगिनींना एकत्र आणले आहे. मंडळाच्या सभासदांची संख्या ७५० असून ती वाढण्यासाठी सर्व ज्ञातीबांधवांनी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे. त्याकरिता मराठा बिझनेस फोरम सतत काम करत आहे.
प्रास्ताविकामध्ये प्राची शिंदे यांनी मंडळाचा इतिहास, केलेले विविध कार्यक्रम, उपक्रम याविषयी माहिती दिली. वर्धापनदिनानिमित्त तुळजाभवानीची पूजा आयोजित केली. आकर्षक रांगोळ्यांनी सर्वांचे मन वेधून घेतले. मुख्य कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, गीत, नृत्य, पोवाडा असे कार्यक्रम रंगले. आकार अॅकॅडमीच्या अमित कदम यांनी बसवलेले मराठा मंडळातील भगिनींचे दांडिया नृत्य खास आकर्षण ठरले. अमित कदम आणि साक्षी जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 08-10-2024














