Nitesh Rane : राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक.. तो क्षण मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय, परतफेड करेन तेव्हाच डिलिट करेन; नितेश राणेंचा इशारा

सिंधुदुर्ग : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना नारायण राणेंना अटक करण्यात आलेल्या घटनेची जखम अजून राणे कुटुंबीयांसाठी भळभळती असल्याचं समोर आलं. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवत अटक केली होती, तो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवला आहे.

ज्या दिवशी त्याची परतफेड करेन त्याच दिवशी तो व्हिडीओ डिलीट करेन असं राज्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले. तसेच दीपक केसरकरांच्या आशीर्वादाने जेल पाहायला मिळाल्याची आठवणही त्यांनी काढली. सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रत्नागिरीमधून नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली होती. त्याची आठवण मंत्री नितेश राणे यांनी वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा काढली.

त्याची परतफेड करणार

नितेश राणे म्हणाले की, “साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करने त्याच दिवशी तो डिलीट करेन. तो क्षण जवळ आलेला आहे.”

दीपक केसरकर भीतीने गोव्यात जाऊन बसले

मंत्री नितेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यासंबंधीही एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, “कोण कुठे जात नाही. सगळ्यांचा हिशोब इथेच होणार. दहा वर्षांच्या प्रवासामध्ये सगळे अनुभव घेतले आहेत. दीपक केसरकरांच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेलपण दिसलंय. पण त्यांनी आम्हाला लोकसभेला साथ दिली त्यामुळे मागचं सगळं पुसून गेलंय. त्यांचं आणि आमचं वैर कधीच नव्हतं. तिसऱ्याला फायदा करुन घ्यायचा होता म्हणून त्याने आमच्यात भांडणं लावली.”

ते आपले आमदार होण्यासाठी प्रयत्न करत होते. आता कुठेतरी गोव्यात बसले आहेत, नितेश कधी अटक करेल या भीतीने. पण सगळ्यांचा हिशोब होणार असंही नितेश राणे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 11-04-2025