रत्नागिरी : शहरातील जयस्तंभ येथे ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नव्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामाबाबत ठेकेदाराने कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याचा फटका एका पादचारी तरुणीला बसला. इमारतीवरील कामगाराने सेन्ट्रींगच्या कामाचा शिल्लक मलबा फावड्याने ओढल्यामुळे तो पंधरा ते वीस फुटांवरून एका तरुणीच्या अंगावर पडल्याने ती जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर संतापलेल्या नागरिकांनी संबंधित बांधकाम ठेकेदारावर चांगलेच तोंड सुख घेतले.
शहरातील जयस्तंभ येथे ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. ग्रामीण भागातून शहराकडे सकाळी येणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, तसेच नर्सिंग कॉलेजसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जयस्तंभ हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे चारही बाजूने रस्त्यावर वर्दळ सुरू असते.
सकाळी पूर्णगड येथून नर्सिंगसाठी आलेली ही मुलगी जावकर प्लाझा रस्त्यावरून जात होती. जयस्तंभ येथील एका नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्या कामावरील कामगाराने सेट्रींगला फावडे एवढे जोरात ओढले की, त्या मुलीच्या अंगावर सेन्ट्रींगचा मलबा पडला. यामध्ये तिच्या नाकाला व पायाला दुखापत झाली. वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि गर्दी केली. त्या मुलीला उठवले आणि तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. तिथे काम करणाऱ्या ठेकेदारासह कामगारावर नागरिकांनी तोंडसुख घेतले. नागरिकांनी मुलीची विचारपूस करून तिला जिल्हा रुग्णालयात
प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत
शहरातील ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यालगत इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी बांधकाम ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करता नये. अशा प्रकारे अपघात घडू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. बांधकांमाच्यावेळी चारही बाजूने ग्रीननेट बांधणे अथवा अन्य उपाययोजना करणे बंधनकारक आहे. पण सध्या याकडे कानाडोळा केला जात असल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 12/Apr/2025








