हवामानातील बदलाचा मासेमारीवर परिणाम

रत्नागिरी : हवामानातील बदलांचा परिणाम मासेमारीवरही झालेला असून; बांगडा, पापलेट, कोळंबीचे दर वधारलेले आहेत. मागील आठवड्यात सायंकाळी वारे वाहत असल्याने मासेमारी नौकांनी समुद्रात जाणे टाळले आहेत. त्यामुळे बंदारात माशांची रेलचेल कमी झालेली पाहायला मिळत आहे.

एप्रिलमध्ये समुद्रात मोठ्या प्रमाणात मासळी मिळते, असा मच्छीमारांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. यंदा मात्र तो फोल ठरलेला आहे. त्यामुळे कष्टकरी मच्छीमार हतबल झालेले आहेत. दिवसभर मेहनत करून आणि पंधरा हजार रुपयांचे डिझेल खर्च करून केवळ पाच हजारांची मासळी हाती लागत आहे. परप्रांतीय नौकांची जिल्ह्याच्या समुद्रात होणारी घुसखोरी आणि फेब्रुवारी, मार्च महिन्यांत हवामानातील बदलामुळे झालेले माशांचे स्थलांतर याचा परिणाम यंदाच्या मत्स्य उत्पादनावर झालेला आहे. मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेकांनी नौकांवरील खलाशांना माघारी पाठविण्यास सुरुवात केलेली आहे.

वारे वाहू लागल्यामुळे पाण्याला प्रचंड करंट होता. जाळी टाकणेही धोक्याचे होते. अपेक्षित मासळी मिळत नसल्यामुळे माशांचे दरही वधारलेले आहेत. मोठ्या पापलेटचा किलोचा दर १५०० रुपयांवर गेला आहे.

मच्छीमारांसाठी यंदाचा हंगाम सर्वात वाईटच गेलेला आहे. काही मच्छीमारांनी खलाशांना सोडून दिले आहे. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे शासनाकडूनही मच्छीमारांना दिलासा मिळणे आवश्यक आहे – अभय लाकडे, मच्छीमार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:01 PM 19/Apr/2025