नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हरयाणातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘बब्बर शेर’ म्हणत त्यांचे आभार मानले. तर, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करुन सत्ता मिळवल्याबाबत म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील जनतेचे मनापासून आभार. राज्यातील इंडिया आघाडीचा विजय हा संविधानाचा विजय आहे. हा लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे.
मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, “आम्ही हरयाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींबाबत आम्ही निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. हरयाणातील सर्व जनतेच्या पाठिंब्याबद्दल आणि आमच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. आम्ही हक्कांसाठी, सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी हा संघर्ष सुरूच ठेवू आणि सामान्यांचा आवाज उठवत राहू.”
जम्मू-काश्मीरबद्दल बोलायचे झाल्यास, शेअक अब्दुल्ला घराण्याच्या नेतृत्वातील नॅशनल कॉन्फरन्स (NC) हा जम्मू आणि काश्मीरमध्ये 42 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर, काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी तितकीशी चांगली राहिली नाही. जम्मू भागात तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली.
काँग्रेस कमकुवत झाली?
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हरियाणातसरकार स्थापन करू शकते, असे मानले जात होते. परंतु निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसच्या आशा मावळल्या आहेत. हरियाणातील पराभवानंतर महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये मित्रपक्षांशी समन्वय साधण्यात काँग्रेसची स्थिती आता कमकुवत होऊ शकते. या दोन्ही राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 09-10-2024














