Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
सर्वच स्तरातून या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणून गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधून तिथे नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पण, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी सारखं त्याच गोष्टी बोलल्याबद्दल मराठी अभिनेत्री सुरभी भावे हिने संताप व्यक्त केला आहे. सुरभीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत “ज्यांच्या घरी इतका आघात झाला आहे. त्या घरांमध्ये जाऊन जाऊन मीडिया आणि राजकारण्यांनी सतत त्यांना तेच तेच बोलायला लावणं सुद्धा क्लेशदायक आहे. त्यांना किमान श्वास घ्यायला तरी वेळ द्या”, असं म्हटलं आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यात दोन स्थानिक दहशतवाद्यांचादेखील समावेश होता. या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी आज उद्ध्वस्त केली. लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करत त्यांची कोंडी केली आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचंही भारत सरकराने म्हटलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 25-04-2025














