सिंधुदुर्ग : कोकणातील राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या आभार मेळाव्यात आपल्या स्पष्टवक्तेपणाने आणि दिलखुलास शैलीने सर्वांचे लक्ष वेधले. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या निलेश राणे यांनी यावेळी आपल्या आणि उदय सामंत यांच्यातील मैत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची निष्ठा यावर भाष्य केले. त्यांच्या या विधानांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
निलेश राणे आणि उदय सामंत : ‘ही दोस्ती तुटायची नाय’
एकेकाळी उदय सामंत यांच्यावर टीका करणारे निलेश राणे आता त्यांच्यासोबतच्या मैत्रीचे दाखले देताना दिसत आहेत. मेळाव्यात बोलताना निलेश राणे म्हणाले, “मी सरकारमध्ये कोणालाही फोन लावत नाही. मला कोणाकडे जायची गरजच पडत नाही. पण फोन लावायचा झाला तर फक्त उदय सामंत यांना लावतो. काही मदत लागली तर याच माणसाला विचारतो.” या विधानातून त्यांनी उदय सामंत यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्यातील दृढ मैत्रीचे संकेत दिले. यासोबतच विरोधकांना देखील हा संदेश दिला की, त्यांची आणि सामंत यांची ही दोस्ती आता अटळ आहे.
महत्त्वाचे विधान : “फोन लावलाच तर फक्त उदय सामंत यांना लावतो. कधी कोणाकडे जात नाही, तशी गरजच पडली नाही.” – निलेश राणे
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता : ‘घरी बसेन, पण शिंदे साहेबांना सोडणार नाही’
निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “ज्या अडचणीच्या काळात शिंदे साहेबांनी मला मदत केली, त्यांना मी कधीच सोडणार नाही. एकवेळ घरी बसेन, पण शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही.” यावेळी त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत शिंदे यांच्याबद्दलची निष्ठा स्पष्ट केली. “मला तिकीट देईन सांगितलं, दिलं आणि निवडूनही आणलं,” असे सांगत त्यांनी शिंदे यांचे कौतुकही केले.
विरोधकांना इशारा : ’25 वर्षे वाट बघावी लागेल’
निलेश राणे यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “आम्ही इथे पक्ष बांधला, त्यामुळे सगळेच बिथरले आहेत. काही लोकांना वाटतं निलेश राणे आणि शिवसेना बदनाम व्हावी. पण मी सांगतो, जे विरोधक माझ्यावर टीका करत आहेत, त्यांना मला पराभूत करण्यासाठी 25 वर्षे वाट बघावी लागेल.” यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
सिंधुदुर्गसाठी समर्पण : ‘दहा वर्षानंतर पुन्हा जिवंत केलं’
निलेश राणे यांनी आपल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दलचे प्रेम आणि समर्पण व्यक्त केले. “मेहनतीने, कष्टाने आलो आहे. स्वतःला बदललं, लोकांसाठी खस्ता खाल्ल्या. का? फक्त माझ्या सिंधुदुर्गसाठी.” दहा वर्षांच्या राजकीय वनवासानंतर पुन्हा जिवंत होण्याचे श्रेय त्यांनी सिंधुदुर्गच्या जनतेला दिले. यावेळी त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरही नाव न घेता टोला लगावला.
उदय सामंत यांच्याकडे मोठी मागणी
निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्याकडे एक खास मागणीही केली. “सामंत साहेब, तुम्ही माझ्या बंधूसारखे आहात. तुमच्याकडे एमआयडीसी खातं आहे. मला मागे सांगितलं होतं, निलेश तुला काहीतरी द्यायचं आहे. ती घोषणा आजच करा.” यासोबतच जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या योगदानाचेही कौतुक केले.
कोकणातील राजकारणात नवे वळण
निलेश राणे यांच्या या भाषणाने कोकणातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. त्यांच्या आणि उदय सामंत यांच्यातील मैत्री, एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची निष्ठा आणि विरोधकांना दिलेले खुले आव्हान यामुळे आगामी काळात सिंधुदुर्ग आणि कोकणातील राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 26-04-2025














