रत्नागिरी : जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासण्यात आलेल्या ३३६ पाणी नमुन्यांपैकी १२ नमुने प्रयोगशाळेत दूषित आले आहेत. या अहवालानुसार जिल्ह्यातील ३.६८ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ६ तालुक्यातील पाण्याचा एकही नमुना दूषित नसल्याने या तालुक्यातील पाणी स्वच्छ आहे.
दूषित पाण्यामुळे कावीळ, अतिसार, गॅस्ट्रो आदी साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाणी स्रोतांचे नमुने घेतले जातात. त्या नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात येते. नमुना दूषित आल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला नाही. साथीच्या आजार न वाढण्यासाठी आरोग्य विभागही कायम सतर्क राहून काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गोळा केलेल्या ३३६ पाणी नमुन्यांपैकी १२ नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये चिपळूण, गुहागर, खेड या तालुक्यातील पाणी नमुने दूषित आले आहेत. तर मंडणगड, दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यात एकही नमुना दूषित आढळलेला नाही.
पाणी दूषित का होते?
पाण्याचा अति उपसा, कारखान्यातील पाणी प्रक्रिया न करता सोडणे, घरगुती घनकचरा व सांडपाणी, टाकाऊ पदार्थ जमिनीवर टाकणे व पुरणे, रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर, उघड्यावरील विष्ठा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 26/Apr/2025














