Asaduddin Owaisi: तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत, काश्मीर आमचा अविभाज्य भाग; खा. ओवैसींनी पाकिस्तानला ठणकावलं

Pahalgam Terror Attack: काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे.पाकिस्तानची आर्थिक कोंडी करा. पाकिस्तानवर अशी कारवाई करा की पुन्हा एकाही भारतीयाचा जीव घेतला नाही पाहिजे. तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत, काश्मीर आमचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा खासदार ओवैसींनी तीव्र निषेध केलाय. दरम्यान, वक्फ बिलात झालेल्या बदलावरूनही ते बोललेत. आमच्या धार्मिक स्थळांच्या जमिनी घेण्याचे हे षडयंत्र आहे. हा काळा कायदा आहे. आम्ही याला फाडतो. असेही ओवैसी म्हणालेत. परभणीत वक्फ कायद्यातील बदलाविरोधात (Parbhani) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात ते बोलत होते.

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले,” देशाच्या प्रमुखांना मी मागणी करतो की त्यांनी पाकिस्तानची कोंडी करावी. आमचा देशाच्या लष्कराचे जेवढे बजेट आहे तेवढे तुमच्या देशाचे आहे. तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत. काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे. काश्मिरी पण आमचेच आहेत. आम्ही त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाहीत. काश्मिरी नागरिकांबद्दल द्वेष पेरला जातोय. मात्र आपल्याला एक राहावंच लागेल. पाकिस्तान आयएसआयएस, एलइटी यांना हेच पाहिजे आहे की भारतात हिंदू मुस्लिम भांडण लागली पाहिजेत. आम्हाला एक राहावंच लागेल. देशाने जी कारवाई करायची ती करावी. काश्मिरी नागरिकांबद्दल जो द्वेष पसरवला जातोय तो घातक आहे. ते पुढे म्हणाले, तुम्ही पाकिस्तान वर अशी कारवाई करा की पुन्हा एकही भारतीयाचा जीव घेतला नाही पाहिजे. पाकिस्तान आपल्यापेक्षा अर्धी पिढी मागे आहे. तिथे ते साधी सुई ही बनवू शकत नाहीत. तुम्ही आमची एकी तोडू शकत नाही. असंही ते म्हणाले.

‘..तुम्हाला वक्फ कायदा मागे घ्यावाच लागेल’: असदुद्दीन ओवैसी

आता देशाच्या अंतर्गत घडामोडींवर बोलतो असं म्हणत वक्फ बिलावर त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी जर जगात नाव करू इच्छितात तर तुम्हाला वकफ कायदा मागे घ्यावा लागेल. अन्यथा तुम्ही एक राजकारणी म्हणूनच ओळखले जाल. आमच्या ईमानावर हल्ला करणारा हा कायदा आहे. आमच्या धार्मिक स्थळांच्या जमिनी घेण्याचे हे षडयंत्र आहे. हा काळा कायदा आहे आम्ही याला फाडतो. मोदींनी हा कायदा बनवला त्यासाठी. मुंबईचा सर्वात मोठ्या व्यक्तीचे या जागेवर घर बांधले आहे. त्याचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे त्यामुळे आपल्या मित्रांसाठी हा कायदा आणला आहे असे खासदार ओवैसी म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 28-04-2025