राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळगाव बाग स्टॉपजवळ २५ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या हिट अँड रनच्या घटनेत सरोज राज बहोरन रावत (वय ४५, मूळ रा. जनकपूर, मध्य प्रदेश, सध्या रा. वारगांव खारेपाटण, ता. कणकवली) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज बहोरन संपत्ती रावत (वय ४२) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या पत्नी सरोज रावत या महामार्गावरून चालत जात असताना मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक अज्ञात) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सरोज रावत यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता आणि पोलिसांना किंवा रुग्णवाहिकेला माहिती न देता पळून गेला.

या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक या घटनेचा अधिक तपास करत असून, फरार वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 30/Apr/2025