महाराष्ट्र दिन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या हुतात्मा स्मारकावर जाऊन पुष्पचक्र अर्पण केले. संयुक्त महाराष्ट्रसाठी या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्व हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते.

यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व महाराष्ट्रवीरांना आदरांजली अर्पण केली. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा 65 वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आज संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना आणि महाराष्ट्रप्रेमींना अभिमान आहे की, आपली राजधानी मुंबई देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरली आहे आणि महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जात आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम राखत असताना ‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा आपण दृढनिश्चय करूया असे अजित पवार म्हणालेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 01-05-2025