‘अभी पिक्चर बाकी है…’, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट

पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचं चोख उत्तर आता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ करून दिलं आहे. ७ मे २०२५ रोजी भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेली दहशतवादी प्रशिक्षण तळे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनांनाच्या तळांवर क्षेपणास्त्र डागली गेली. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधीच पाकिस्तान बिथरलेला असताना आता भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी ‘अभी पिक्चर बाकी है…’ म्हणत त्यांचं टेन्शन आणखी वाढवलं आहे.

जर, पाकिस्तानने भारतातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला, तर असे आणखी हल्ले शक्य आहेत, असे सूचक संकेत माजी लष्करप्रमुखांनी दिले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांच्या क्रूर हत्याकांडानंतर धाडसी आणि सुनियोजित प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी हद्दीत मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली. ऑपरेशन सिंदूर करत भारताने दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त!

रात्रीच्या अंधारात केलेल्या या कारवाईत भारतीय हवाई दलाने नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. ही ठिकाणे दहशतवादी कारवायांची प्रमुख केंद्रे मानली जात होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रतिसाद होता, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे दोन कुप्रसिद्ध दहशतवादीही मारले गेले आहेत. सीमेपलीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला युद्धाचे कृत्य म्हणून वर्णन केले आणि म्हटले की त्याला योग्य उत्तर दिले जाईल.

संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलं?

संरक्षण मंत्रालयाने मध्यरात्री जारी केलेल्या पत्रकात म्हटलं की, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. याच ठिकाणावरून भारताविरोधात दहशतवादी हल्ल्याची योजना बनवली जात होती आणि हल्ले घडवले जायचे. भारतीय सैन्याने एकूण ९ ठिकाणांना निशाणा बनवले. आमच्या सैन्याने कुणालाही चिथावलं नाही. कुठल्याही पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांना टार्गेट केले नाही. भारताने केवळ गुन्हेगारांना लक्ष केलं, असं म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 07-05-2025