‘ऑपरेशन सिंदूर’नंतर गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; ‘या’ 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

Operation Sindoor: पाकिस्तान समर्थिक दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराने काल मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली.

या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले, ज्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सीमावर्ती नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शाहांनी युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला.

या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी यांनी बोलावलेल्या बैठकीत जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय, लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांसह सर्व राज्यांचे डीजीपी आणि मुख्य सचिव या बैठकीत हजर होते.

पीएम मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
भारतीय लष्कराने मंगळवारी-बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे प्रमुख अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. शिवाय, यात अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. तसेच, या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त
भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 07-05-2025