Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे वक्तव्य

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली. त्यानंतर नरमलेल्या पाकिस्तानाने अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी केली. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले.

सिमला करारानुसार तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र, यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सिंधू करार रद्द केला. वाघा-अटारी सीमा बंद केल्या. पाकिस्तानशी व्यापारही थांबवला. अखेर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशहतवाद्याचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानाने अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी केली. मात्र, शरद पवार यांनी देखील भारत पाकिस्तान यांच्यात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी योग्य नसल्याचे म्हटले.

शरद पवार काय म्हणाले?
‘भारताने शिमला कराराचे पालन करावे आणि तिसऱ्या देशांचा हस्तक्षेप टाळावा. १९७२ च्या शिमला करारानुसार, जम्मू-काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यानच सोडवला जावा, असे ठरले. त्यामुळे कोणत्याही तिसऱ्या देशाने किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेने या विषयात हस्तक्षेप करू नये. काश्मीरविषयी तिसऱ्या देशाने बोलणे किंवा मध्यस्थी करणे कराराच्या विरोधात आहे’, असे पवारांनी स्पष्ट केले.

आमचा विषय आम्ही सोडवू- शरद पवार
शिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती गांधी यांच्यात झाला. आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू, आमचा विषय आम्ही सोडवू, इतरांनी त्यात नाक खूपसण्याचे कारण काय? आपल्या घरगुती वादात तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप चालणार नाही. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्या अंतर्गत बाबींबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 13-05-2025