अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

रत्नागिरी : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून (ता.१९) सुरुवात होत आहे.

यंदा विद्यार्थ्यांना एकाच अर्जावर कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यामुळे विद्यार्थी संख्या आणि जागांची उपलब्धता याचाही ताळमेळ साधला जाणार आहे. जिल्ह्यात १३७ कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन ११ वी प्रवेशासाठी सज्ज झाली आहेत.

जिल्ह्यातील १६७ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ३० कनिष्ठ महाविद्यालय हे सीबीएसई, सैनिक शाळा, समाजकल्याण शाळा, ११ वी वर्ग अजून सुरू नसलेले व बंद असलेली कनिष्ठ महाविद्यालये वगळून १३७ कनिष्ठ विद्यालये असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा राज्यभर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाणार आहे. पूर्वी मर्यादित ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात असे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आवडीचे महाविद्यालय घरबसल्या निवडता येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेचा यापूर्वीचा अनुभव पाहता दरवर्षी तारीख पे तारीख करून प्रवेश प्रक्रिया लांबविली जात असे. अर्धे वर्ष संपले तरी प्रवेशाला दिरंगाई होत होती. आता मात्र ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. प्रवेशाचे सर्व टप्पे १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. यात पालकांसह विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने अधिकृतपणे mahafyjcadmissioin.in हे संकेतस्थळ आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश द्यायचा असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मान्यता घ्यावी लागाणार आहे. यामुळे मान्यता नसलेल्या किंवा अनधिकृतरीत्या अकरावीला प्रवेश देणाऱ्या संस्थांना आळा बसणार आहे, असे माध्यमिक, उच्च माध्यामिक शिक्षण विभागाकडून सागंण्यात आले. यापूर्वी क्षेत्रनिहाय संकेतस्थळ उपलब्ध होते, परंतु यंदा https;//mahafyicadmission.in या संकेतस्थळावरून अकरावीचे प्रवेश होतील. केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश होणार असल्याने विद्यार्थ्यांना पसंतीक्रमाचे राज्यभरातील महाविद्यालयांचे पर्याय एकाच अर्जामध्ये नोंदवता येणार आहेत.

अनधिकृत संकेतस्थळावर विश्वास ठेवू नका
२०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने अनधिकृत संकेतस्थळे (वेबसाईट) व इतर सोशल मीडियाद्वारे (डिजिटल माध्यम) माहिती प्रसारित होत आहे. अनधिकृत संकेतस्थळ डिजिटल माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, माहितीवर विश्वास ठेवून नये किंवा त्या आधारे प्रवेश प्रक्रिया करू नये.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
राज्य शासन, केंद्र सरकार किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. दहावी किंवा समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, तसेच संबंधित विद्यार्थ्यांला लागू असल्यास विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, ईडब्यूएस पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, आजी-माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र, अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र, परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक, बदली आदेश आणि सामीलीकरण पत्र तयार ठेवायचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 19-05-2025