रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्था आप स्वबळावर लढविणार

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा आम आदमी पक्षाने घेतला आहे.

येथील आम आदमी पार्टीच्या (आप) पदाधिकाऱ्यांची बैठक आपच्या मारुती मंदिर येथील कार्यालयात झाली त्यावेळी याबाबतचा निर्णय झाला.

आपच्या वतीने महाराष्ट्र सुराज्य मोहीम १ मेपासून सुरू करण्यात आली असून, या मोहिमेच्या निमित्ताने आपचे वरिष्ठ पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्यानुसार ते रत्नागिरीतील कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. चला एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवू या, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातली स्वराज्य साकार करू या, न्याय, क्षमता आणि सन्मान यासाठी अखंड प्रयत्न करू हा उद्देश ठेवून ‘आप’चे महाराष्ट्र राज्यातील समितीचे सचिव डॉ. अभिजित मोरे, राज्य संघटक डॉ. रियाज पठाण, ॲड. मनीष मोडक, संदीप देसाई, राज्य मीडिया नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.

यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. रवी जाधव, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती पाटील, जिल्हा सचिव हबीब बावानी, सचिन आपीष्टे, खालील वस्ता, नाझीम मजगावकर, जिया मुल्ला, हबीब सोलकर, मुफ्ती नाईक यांच्यासह रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत शहरातील विविध स्थानिक मुद्द्यांवर आणि समस्यांवर चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या अनुषंगाने सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 20-05-2025