रत्नागिरी : जिल्ह्यात पडत असलेल्या वळवाच्या पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला फटका बसलेला आहे. संगमेश्वर परिसरात काँक्रिटीकरण झालेल्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहन चालवणाऱ्यांना कसरत करावी लागत होती. पाणी निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याचे या वेळी दिसून आले आहे.
मॉन्सून दाखल होण्यापूर्वी संपूर्ण महामार्गावरील पाणी साचणारी किंवा कामे सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा पावसामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. त्यावर आतापर्यंत दहा हजार कोटींहून अधिक निधी खर्ची पडलेला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेडदरम्यान रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. खेड, चिपळूणमधील बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. चौपदरीकरणातील त्रुटी वळवाच्या पावसात प्रकर्षाने दिसून आल्या आहेत.
हलक्या पावसानेही संगमेश्वर परिसरातील रस्त्यावर तलाव बनत आहे. काही ठिकाणी अचानक पाऊस पडल्याने दुचाकी घसरल्याचे प्रकार घडले. हा रस्ता बशीसारखा मधल्या बाजूला खोलगट झाल्याने पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले पाहायला मिळत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्याने साचलेले पाणी बराच काळ तसेच होते. त्यामुळे बांधकामाच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे पाणी काढण्यासाठी जेसीबीने दुभाजक फोडले जात आहेत. यामुळे महामार्गाचे काम नियोजनपूर्वक आणि अभ्यास करून झाले नसल्याचेच पुढे येत आहे. पावसाळ्यात रस्ता जलमय होणार हे नक्की आहे. या सगळ्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून अपघात होण्याची शक्यता आहे. पाणी साचलेल्या ठिकाणाहून प्रवासीही जीव मुठीत घेऊन वाहने हाकत आहेत. पैसाफंडपासून पुढे धामणीपर्यंत हे चित्र पाहायला मिळाले. संगमेश्वर बाजारपेठ परिसरात ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. तिथे वाहने ये-जा करण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन केले गेले नाही तर ऐन पावसाळ्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसात पूरपरिस्थितीवेळी महामार्गावरील वाहतूकही खंडित होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या आढाव्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करून तिथे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या होत्या; मात्र त्यानुसार बांधकाम विभागाकडून कार्यवाही होताना दिसत नाही.
महामार्गावर पावसाळ्यात योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर या विरोधात बांधकाम विभागाला जाब विचारला जाईल. यंदा पाऊस लवकर सुरू होईल. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत. – संतोष थेराडे, संगमेश्वर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 20-05-2025














