Maharashtra Weather Update: ‘मान्सून’पूर्व अवकाळीचा जोर आणखी वाढणार..

मुंबई : गुरुवार दि. २२ ते शनिवार दि. २४ मे पर्यंतच्या तीन दिवसात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी ह्या ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी ह्या जिल्ह्यात तर ह्या जोरदार पावसाचा प्रभाव सोमवार दि. २६ मे पर्यंत ही राहू शकतो. ह्या कालावधीत विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते.

पुढील ३ दिवसातील पावसाचा जोर कशामुळे?
अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी समोर तयार झालेल्या हवेच्या कमी दाब क्षेत्रातून, आवर्ती चक्रीय वाऱ्यांची निर्मिती व त्याचे उत्तरेकडे होणारे मार्गक्रमण ह्यातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात अवकाळीचे हे वातावरण कधी पर्यंत असेल?
एकंदरीत जरी शनिवार दि. ३१ मे पर्यंत पावसाचे वातावरण असले तरी गुरुवार दि. २९ मे पासून महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण काहीसे निवळण्याची शक्यता जाणवते. अर्थात मान्सूचे केरळातील आगमनाची तारीखच ह्याची दिशा ठरवेल.

अवकाळी पावसाच्या ओलीवर आगाप पेरणीसाठी धाडस करावे काय?
– अवकाळी पावसाची स्थिती सध्या जरी चांगली वाटत असली तरी, प्रत्यक्षात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन केव्हा होते आणि आगमनानंतर त्याच्यावितरणाची स्थिती व मान्सून च्या पावसावर मिळालेल्या ओलीची खोली ह्यावर हे ठरवता येईल.
– महाराष्ट्रात ह्या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा, असे वाटते.
– परंतु कपाशी व टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी, एखाद्या-दोन सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, असे वाटते.

– माणिकराव खुळे
निवृत्त हवामान शास्त्रज्ञ
भारतीय हवामान विभाग, पुणे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 22-05-2025