Rain Alert: पुढील २४ तासांसाठी राज्यात जोरदार पावसाचा इशारा

पुणे : राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर कायम असून सलगच्या पावसाने फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुढील २४ तासांसाठी राज्याच्या विविध भागांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे.

२४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यांतील घाट विभाग, नांदेड, लातूर, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल.

यावेळी वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० इतका असेल. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे, तर अन्य जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असून, या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट दिला आहे.

मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांत गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे खरीप हंगामपूर्व शेती कामांत व्यत्यय निर्माण झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, शेतकरी हतबल झाले आहेत. फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.