रत्नागिरी : गळक्या एसटी बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप

रत्नागिरी : रत्नागिरी, शहर जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवली असताना एसटी बसेसमधूनही गळती सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. रत्नागिरी-लांजा, रत्नागिरी-राजापूर, पावस या मार्गावर जुन्या, छत गंजलेल्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गळती थांबवून आणि दुरुस्ती करूनच बसेस मार्गावर पाठवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात काजरघाटीमार्गे लांजा मार्गे प्रवास करणाऱ्या एसटीच्या प्रवाशांना एसटीच्या छत गळून पाणी सीटवर पडत असल्याने भिजत प्रवास करावा लागला. गंजलेल्या छतातून पाणी शर्टावर उडाल्याने काही जणांचे कपडे खराब झाले. जिथे रस्ते चांगले आहेत त्या मार्गावर गंजक्या, खराब झालेल्या एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

पावसात एसटीची दुर्दशा उघड झाली आहे. पावस, काजरघाटीमार्गे लांजा, लांजा रत्नागिरी व जवळच्या गावांत जाण्यासाठी खराब, गंजक्या बसेस सोडल्या असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. नवीन बसस्थानक झाल्यामुळे प्रवासी आनंदात असताना गळक्या बसेसमुळे प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे. गळक्या छताच्या एसटीमुळे थेंब थेंब पाणी सीटवर पडते. काही सीट तुटक्या, गाड्यांच्या खिडक्याही तुटलेल्या आहेत. काही ठिकाणी खिडकी बंद करूनही पावसाचे पाणी आत येते. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वेळापत्रक कोलमडले
मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यानेही एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. पहिल्याच पावसात प्रवाशांची तारांबळ उडाली. दुसरीकडे आता नवीन बसस्थानकामुळे पूर्वीचा रस्त्यावर उन्हा पावसात उभे राहण्याचा त्रास कमी झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. परंतु बसेस वेळेत सुटत नसल्याबद्दल प्रवासी नाराज आहेत. तालुक्यातील बसेसचे नियोजन नीट पद्धतीने करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:52 AM 26/May/2025