राजापूर : गेल्या आठवडाभरापासून तालुक्यामध्ये सुरू असलेली पावसाची रिपरिप कालही दिवसभर सुरू आहे. या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये तुळसुंदेवाडी (होळी) येथील योजना डोर्लेकर यांच्या घराची पडझड होऊन नुकसान झाले. या नुकसानीची तत्काळ दखल घेत ग्रुपग्रामपंचायत दळेकडून आपदग्रस्त डोर्लेकर कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत करण्यात आली.
गेल्या आठवडाभरापासून तालुक्यामध्ये मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर राहिलेला आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करीत पडणाऱ्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी खडखडीत झालेले नदीनाले पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. सातत्याने पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसामध्ये खरीप हंगामापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे रखडली आहेत. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाण्याऐवजी घरी राहणे पसंत केले आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये तालुक्यामध्ये ४९.७५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसामध्ये होळी-तुळसुदेवाडी येथील योजना डोर्लेकर यांच्या घराची पडझड झाली, त्यामध्ये डोर्लेकर यांच्या घराचे छप्पर कोसळले. त्यांना दळे ग्रामपंचायतीकडून तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी महेश करंगुटकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या पावसाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. सागवे येथील अकरा केव्ही फिडर नादुरुस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झालेल्या सागवे, शिरसे, कुंभवडे, नाणार, चांदवण, बुरंबे, तर ३३ केव्ही वाहिनी नादुरुस्त झाल्याने पाचल परिसरातील पाचल, पांगरे, येरडव, करक, कारवली, आजिवली, जवळेथर, मूर, काजिर्डा आदी गावांमधील खंडित झालेला वीजपुरवठा रविवारी दुपारनंतर सुरळीत झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 26/May/2025














