रत्नागिरी : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे १२०० मीटरचे काम पावसातही युद्धपातळीवर सुरू आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी बंधारा ४० फूट आत समुद्रात घेतला. यावर साडेतीन कोटी रुपये खर्च करून पर्यटनासाठी हा बंधारा उपलब्ध करण्यात येणार आहे. बंधाऱ्याचे काम झाल्यामुळे उधाणाला किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या अजस्त्र ३ ते ४ मीटरच्या लाटांची तीव्रता मात्र कमी झाली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. उधाणाच्या भरतीमुळे वारंवार या बंधाऱ्याची चाळण होते. अजस्त्र लाटा बंधारा गिळंकृत करून मानवी वस्तीमध्ये समुद्राचे पाणी शिरते. यामुळे नागरिक भयभीत होऊन पावसाळ्यात त्यांना रात्र जागून काढावी लागते; परंतु आता सुमारे साडेतीन किमीच्या या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम पूर्ण होत आले आहे. तीन वर्षांमध्ये एकूण ३ हजार १५० मीटरच्या कामापैकी १ हजार ९५० मीटरचे काम झाले आहे. जयहिंद चौक ते पांढरा समुद्र असा १२०० मीटरचा टप्पा राहिला होता. त्याचे कामदेखील सुरू झाले आहे.
मुळात समुद्राचे एवढे अतिक्रमण झाले आहे की, सातबारावर तो आला आहे. अनेकांच्या माडाच्या बागा, संरक्षक भिंती समुद्राने गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे हा धूपप्रतिबंधक बंधारा समुद्रातूनच व्हावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. त्याबाबत त्यांनी आपली कैफियत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडली होती.
पालकमंत्री सामंत यांनी मरीन ड्राईव्हप्रमाणे हा बंधारा बांधण्याचा आराखडा तयार केला. या बंधाऱ्यामुळे संपूर्ण मिऱ्यावासीयांचे संरक्षण होईल आणि पर्यटनवाढीलाही मदत होईल, असा त्यांचा उद्देश होता. त्या अनुषंगाने त्यांनी बंधाऱ्याची रचना केली. बंधारा ४० फूट आत समुद्रातून बांधण्यात आला आहे. त्यावर चांगला रस्ता होणार असून, पर्यटनदेखील वाढणार आहे. जयहिंद चौक ते पांढरा समुद्र असे १२०० मीटरच्या बंधाऱ्याचे रखडले होते; परंतु आता पावसात हे काम सुरू ठेवले आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 26/May/2025














