संगमेश्वर : गेली दोन वर्षे आरवली येथील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. या वर्षी येथील परिस्थिती अजूनच बिकट झाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आरवली येथे गेली दोन वर्षे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. संथ गतीने चाललेल्या कामाचा फटका येथील रहिवासी व येथून प्रवासासाठी आलेल्या नागरिकांना बसत आहे.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याआधीच पुलाखालील स्लॅबमधून पाण्याच्या धारा लागल्या आहेत. शिवाय गोव्याकडून पनवेलकडे जाणाऱ्या दिशेने सर्व्हिस रोडचे काम सुरू असल्याने याठिकाणी पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना गेले दोन महिने अर्धा किमीपर्यंत गरम पाण्याच्या कुंडापर्यंत पायपीट करून उन्हापावसात एसटीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.
उड्डाणपुलासोबतच सर्व्हिस रोडचे काम जलद गतीने होण्याची गरज होती. सध्या मुंबई, पुणेस्थित जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढू लागली आहे. आरवली येथे आल्यावर मुंबईला जाणाऱ्या बसेससाठी प्रवाशांना काळोखातून गरम पाण्याच्या कुंडाजवळ हायवेवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. याठिकाणी प्रवाशांना अपुरी जागा असल्यामुळे महामार्गावर रस्त्यातच उभे राहावे लागते. याठिकाणी अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवाय उड्डाणपुलाखाली देखील चिखलाचे साम्राज्य झाले आहे. आरवली येथे चिपळूणकडे जाणारा सर्व्हिस रोड बंद केल्यामुळे चिपळूणकडून गोव्याकडे जाणाऱ्या एकेरी सर्व्हिस रोडवरूनच दोन्ही बाजूला जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. अरुंद असलेल्या सर्व्हिस रोडमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या सर्व्हिस रोडवरून दोन मोठी वाहने एकाच वेळी पास होत असल्यामुळे सतत येथे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 26/May/2025














