रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला परिसरात वीरगळ व सतीशीळ्यांचा अभ्यास करताना हनुमान वाडी या परिसरात जुनी सती स्मृतीशीळा निदर्शनास आली. ही स्मृतीशीळा जागा मालक विवेक दत्ताराम बंडबे यांच्या अंगणात स्थापित आहे. याबाबतचे संशोधन करजुवे (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी इतिहास संशोधक, कोकण दुर्ग अभ्यासक, वीरगळ व सती-शीळा अभ्यासक स्नेहल बने यांनी केले आहे.

या स्मृतीशीळेची वास्तूरचना साधारण दोन ते अडीच फूट एवढी आहे. चौकोनी उभी शीळा व त्यावर गोलाकार घुमट अशी रचना आहे. स्मृतीशीळेच्या आत मध्ये सतीच्या १३ ते १४ से.मी. लांबीच्या पादुका आहेत. ज्याची दिशा पूर्व पश्चिम आहे.
सध्याच्या स्थितीत पादुकांवर शेवाळ जमलेले असून देखील पादुकांचा आकार स्पष्ट व सुस्थितीत दिसत आहे. सतीच्या उजव्या पायाच्या बोटांची पादुकेची रचना थोडी जीर्ण झालेली असून आज-तागायत यांचे चांगले जतन केलेले आहे. स्मृतीशीळेला नव्याने सिमेंटचा वापर करून रंग रंगोटी केलेली आहे. जेणेकरून तिचे जतन झाले पाहिजे असे जागा मालकास श्री. बेडबे यांना वाटले म्हणून त्यांनी हे संवर्धन कार्य केले.
पादुकांच्या पुढे दिवा बत्तीची सोय करण्यासाठी एक छोटा चबुतरा बांधून घेतला व तेथे नित्यनेमाने श्रद्धेने पूजाअर्चा केली जाते. अशाप्रकारे सती गेलेल्या स्त्रियांच्या बलीदानाची जाण ठेऊन त्यांच्या स्मृतींचा इतिहासाचे जतन व संवर्धन आपण सर्वांनी केले पाहिजे.
या शोध कार्यात तेथील ग्रामस्थ, बाले किल्लेदार तन्मय जाधव यांची देखील मदत झाली. या स्मृतीशिळेचा इतिहास अधिक जाणून घेव्यासाठी संशोधन कार्याचे प्रयत्न चालू राहतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 27/May/2025














