चिपळूण : शहरातील खेंड परिसरामध्ये गेले दोन-तीन दिवस पथदीप बंद आहेत. वारंवार सूचना देऊनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या भागात काही सदनिका फोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे प्रकारही घडले आहेत. भविष्यात अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने या परिसरातील पथदीप सुरू करावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अंकुश आवले यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
काही दिवसांपूर्वी खेंड भागामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या परिसरातील काही सदनिका रात्री फोडल्या. दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते चोरटे पसार झाले. या घटनांमुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पथदीप बंद असल्यामुळे चोरटे रात्री काळोखाचा फायदा घेऊन संधी साधत आहेत.
त्याचबरोबर रात्रपाळीला जाणारे किंवा रात्रपाळीवरून येणाऱ्या नागरिकांच्याही जिवाला धोका निर्माण झालेला आहे. रात्री चोरांकडून हल्ला झाल्यास नाहक बळी जाऊ शकतो, अशी भीतीही नागरिकांच्या मनात आहे. या विषयाची गांभीयनि दखल घेऊन खेंड परिसरासह शहरात त्या त्या भागांतील बंद असलेले पथदीप सुरू करावेत, तसेच मोक्याच्या ठिकाणी हायमास्ट उभारावे, अशी मागणी आवले यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 28/May/2025














