‘देश त्यांचा संघर्ष कधीही विसरू शकत नाही’, पंतप्रधान मोदींची वीर सावरकरांना जयंतीनिमित्त आदरांजली

Vinayak Damodar Savarkar Jayanti: आज(28 मे) भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. देशाला ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी स्वातंत्र्य चळवळीतील तरुणांमध्ये एक अभुतपूर्व जोश संचारला होता. दरम्यान, आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “भारतमातेचे खरे सुपुत्र वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. परकीय राजवटीने दिलेल्या कठोर यातनाही मातृभूमीप्रती त्यांच्या समर्पणाला धक्का लावू शकली नाही. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या अदम्य धैर्याची आणि संघर्षाची गाथा राष्ट्र कधीही विसरू शकत नाही. देशासाठी त्यांचे बलिदान आणि समर्पण विकसित भारताच्या निर्मितीमध्येही एक मार्गदर्शिका राहील.”

या पोस्टसोबत पीएम मोदींनी सावरकरांबाबत त्यांचे विचार मांडणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

वीर सावरकरांबद्दल थोडक्यात माहिती
सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला. त्यांनी तरुणपणापासूनच ब्रिटीश राजवटीविरुद्ध रणशिंग फुंकले. सावरकरांनी लंडनमध्ये ‘अभिनव भारत’ आणि ‘फ्री इंडिया सोसायटी’ सारख्या संघटनांची स्थापना केली. त्यांनी भारतीय तरुणांना सशस्त्र क्रांतीसाठी प्रेरित केले. ब्रिटिशांनाही सावरकरांची इतकी भीती वाटायची की, त्यांनी सावरकरांना दोनवेळा काळ्यापाण्याची शिक्षा दिली होती. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला. तुरुंगातून बाहेर आल्यावरही सावरकरांनी ब्रिटिशांविरोधात आपला संघर्ष सुरुच ठेवला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 28-05-2025