रत्नागिरीत ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार’: विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव!

रत्नागिरी, २९ मे २०२५ : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा आणि न्यायक्षेत्रात आपल्या कार्याची छाप सोडणाऱ्या खालील गुणवंत महिलांना ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला : श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, ॲड. रुची महाजनी, सौ. अर्चना गोखले, सौ. संगममित्र फुले, डॉ. पल्लवी यादव, क्रीडा अधिकारी ऐश्वर्या सावंत, डॉ. ज्योती चव्हाण

या कार्यक्रमाचे आयोजन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे आणि शहराध्यक्षा सौ. पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी माजी नगरसेविका सौ. सत्यवती बोरकर, सौ. मानसी करमरकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. प्रणाली रायकर, सौ. संपदा तळेकर तसेच महिला पदाधिकारी सौ. सायली बेर्डे, सौ. सारिका शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त महिलांनी यावेळी आपल्या कार्याचा अनुभव शेअर करत महिला सशक्तीकरण, नेतृत्व आणि सामाजिक बदल या विषयांवर आपले विचार मांडले. नारीशक्तीच्या योगदानाचा गौरव करत, महिलांनी सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा सोहळा महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा आणि त्यांना प्रेरणा देणारा ठरला.