चिपळूण : यावर्षी मे महिन्यात झालेला पाऊस मुंबई, पुणेसारखाच चिपळूणमध्ये झाला; मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांनी सुचवलेल्या सूचनांवर प्रशासनाने काम केले, त्यामुळे सरासरी शंभर मिमी पाऊस होऊनही पहिल्या पावसाळ्यात शहरात कोठेही पाणी साचले नाही. त्यामुळे पालिकेची नालेसफाईची मोहीम फत्ते झाली.
डोंगराळ भागातून शहरात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा तत्काळ निचरा होत नाही. त्यामुळेही शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून दरवर्षी नालेसफाईसह इतर उपाययोजना केल्या जातात; मात्र पहिल्याच पावसात शहरात पाणी साचल्यानंतर पालिकेच्या उपाययोजना कुचकामी होत्या, असा आरोप नागरिकांकडून केला जात होता. यापूर्वी नालेसफाई केल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात नाल्यात माती येऊन नाले पुन्हा मातीने भरलेले असायचे. त्या वेळी स्वच्छ केलेल्या नाल्यात डोंगरावरून माती आल्याचे स्पष्टीकरण पालिकेकडून दिले जायचे.
यावेळी प्रशासनाने एकतर्फी उपाययोजना न करता प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले आणि तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी २ एप्रिलला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नागरिकांची बैठक घेतली. नागरिकांकडून सूचना मागवल्या, त्यानंतर मॉन्सूनपूर्व नियोजन आणि तयारीला सुरुवात झाली.
मुख्याधिकारी विशाल भोसले, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, वैभव निवाते नागरिकांनी सुचवलेल्या जागेवर गेले. नागरिकांना बोलावून तेथील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करता येईल अशा ठिकाणी पालिकेचे सफाई कामगार लावून नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. चिपळूण शहरात १० मेपासून पावसाचे आगमन झाले. २१ मेनंतर पावसाचा जोर वाढला होता. दिवसाला सरासरी १०० मिमी पाऊस होत होता. पूर्वी दहा मिनिटांच्या पावसाने शहरात पाणी साचायचे. या वेळी अर्धा ते पाऊण तास सलग पाऊस झाला तरी शहरात अपवाद वगळता कुठेही पाणी साचले नाही. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे.
पावसाळ्यात शहरात पाणी भरू नये म्हणून ज्या ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या उपाययोजनांचा अभ्यास केला. महामार्ग विभागाला सूचना केल्या. गाळ काढण्याला प्राधान्य देताना नालेसफाई आणि इतर उपाययोजना केल्यामुळे मुंबई, पुण्यासारखाच पाऊस चिपळूणमध्ये होऊनही पाणी साचले नाही. पुराचे पाणी कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न कायम राहतील-आकाश लिगाडे, प्रांताधिकारी, चिपळूण
चिपळूण शहरातील नाले व पऱ्हे यांची स्वच्छता पालिकास्तरावर करण्यात आली. त्यासाठी पालिकेचे ३० सफाई कामगार आणि २ जेसीबी दोन महिने कार्यरत होते. पहिल्या पावसात शहरात कुठेही पाणी तुंबले नाही, हे त्याचे फलित आहे, मात्र पाणी साचत असेल तर पालिकेशी संपर्क करावा. – वैभव निवाते, आरोग्य विभागप्रमुख, चिपळूण पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 04/Jun/2025














