Maharashtra Weather Update: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’

पुणे : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर आता पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

आज (गुरूवारी ता. 5) राज्यात विजांच्या कडकडटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील तापमानामध्ये मोठे चढ -उतार सुरू आहेत.

ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा

कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा त्रासदायक ठरत आहे. बुधवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. आज (ता. 5) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

तर राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्हे तसेच घाटमाथ्यावर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मान्सूनची गती मंदावली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाडा भागांत पुन्हा वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे.

राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुजरात राज्यात हवेच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, ती स्थिती अद्यापही कायम आहे. यासोबतच बांगलादेशाच्या उत्तर भागातही अशीच चक्रीय स्थिती आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत आहे.या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, सकाळच्या सुमारास हवामानात ऊन पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, पुणे, पुणे घाटमाथा, जळगाव, नाशिक, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली धाराशिव, अकोला, अमरावतीं, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 05-06-2025