ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक एसटी बस धावणार, ५ हजार गाड्या ताफ्यात दाखल होणार

राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता आगामी काळात ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक एसटी बस धावणार आहे. यासाठी पुढील २ वर्षात ५ हजार इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

यामुळे इंधनावर होणारा खर्च कमी होणार आहे, तसेच पर्यावरणाचीही हानी कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ग्रामीण भागात इलेक्ट्रिक एसटी बस धावणार

समोर आलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाच्या अनेक आगारातील बस कालबाह्य झालेल्या आहेत, यातील काही बस नादुरुस्त असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून या बस खरेदी केल्या जाणार आहेत. पुढील २ वर्षात ५ हजार इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांनाही इलेक्ट्रिक बसने प्रवास करता येणार आहे.

२ वर्षांत ५ हजार बस ताफ्यात दाखल होणार

एसटी महामंडळाने गेल्या वर्षी ५,१५० एसी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मार्च २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत फक्त २२० बस पुरविल्या होत्या, त्यामुळे कंपनीला इशारा पत्र देण्यात आले होते. आता कंपनीला बस पुरविण्याचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार, २०२५ मध्ये ६२० बस, २०२६ वर्षात २१०० बस आणि २०२७ पर्यंत उर्वरित बस पुरविल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामीण भागातील प्रवास गारेगार होणार

एसटी महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसमध्ये एसी असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास गारेगार होणार आहे. त्याचबरोबर या बस इलेक्ट्रिक असल्याने यासाठी लाणणाऱ्या इंधनाचा खर्चही कमी होणार आहे. तसेच डिझेल बसमुळे पर्यावरणाची हानी होते, मात्र इलेक्ट्रिक बसमुळे ही हानी टळणार आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 05-06-2025