रत्नागिरी : महावितरणतर्फे विद्युतसुरक्षा, वीज बचत रॅली

रत्नागिरी : वीज अपघातांबाबत ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि काळाची गरज ओळखून वीज बचत करावी हा संदेश देण्यासाठी महावितरणने ‘विद्युतसुरक्षा व वीज बचत रॅली’ काढली. रत्नागिरीत काढलेल्या या फेरीचे उद्घाटन परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते करण्यात आले.

या विद्युतसुरक्षा व वीज बचत रॅलीला अधीक्षक अभियंता सुनीलकुमार साने, प्रभारी सहायक महाव्यवस्थापक प्रणाली निमजे, कार्यकारी अभियंते अभिजित सिकनीस, नितीन पळसुलेदेसाई, जितेंद्र फुलपगारे, श्रीकृष्ण वायदंडे तसेच महावितरण अधिकारी, शाखा अभियंते, महावितरण कर्मचारी व बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार, हे ब्रीद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात विद्युतसुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. याचाच भाग म्हणून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी रत्नागिरीत नाचणेरोड ते मारुती मंदिर चौक, आरोग्यमंदिर पुन्हा रत्नागिरी परिमंडल कार्यालयापर्यंत फेरी काढली.

या वेळी कर्मचाऱ्यांनी वीजसुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते तसेच वीजसुरक्षा व वीज बचतच्या विविध घोषणाही दिल्या. परिमंडल कार्यालयात आल्यानंतर मुख्य अभियंता अनिल डोये यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीजसुरक्षा व वीज बचतबाबत मार्गदर्शन केले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग पाटणकर यांचा मोलाचा वाटा होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 07/Jun/2025