पावसाळ्यात ‘कोरे’ मार्गावर ६७६ कर्मचाऱ्यांची करडी नजर

खेड : कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने उपाययोजनांची आखणी केली आहे. पावसाळ्यात ६७६ कर्मचाऱ्यांचा रेल्वे मार्गावर दिवस-रात्र करडी नजर राहणार आहे.

बेलापूर, रत्नागिरी आणि मडगावमध्ये २४ नियंत्रण कक्ष कार्यरत राहतील. असुरक्षित ठिकाणी २४ तास जागता पहारा असेल. ९ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात येणार आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ६ ठिकाणी वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेतील त्या-त्या विभागाच्या सर्व यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. यंदा पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी १५ जूनपासून करण्यात येणार आहे. २० ऑक्टोबरपर्यंत कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग मंदावणार आहे. अतिवृष्टीत दृश्यमानता कमी झाल्यास ताशी ४० कि.मी.च्या वेगाने रेल्वेगाड्या धावणार असून तशा सूचना लोकोपायलटना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जलदरित्या हालचाल करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. रत्नागिरी, वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन वैद्यकीय मदतीच्या व्यवस्थेसह अपपात निवारण वैद्यकीय व्हॅनही सज्ज ठेवण्यात येणार आहे. वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वैर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी आदी ९ प्रमुख स्थानकांमध्ये देखभाल वाहने (आरएमव्ही) तैनात ठेवण्यात येणार आहेत.

वाऱ्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी बसवली यंत्रणा
वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पानवल व्हायाडक्ट (रत्नागिरी आणि निवसर दरम्यान), मांडवी पूल (विविम आणि करमाळी), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्ना) आणि शरावती पूल (होज्ञावर आणि माणकी) या चार ठिकाणी वाऱ्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी मंत्रणा बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोलमन, वॉचमन, लोकोपायलट गार्ड आणि नियंत्रण कार्यालयातील इतर फील्ड देखभाल कर्मचाऱ्यांमध्ये तत्काळ संपर्क साधण्यासाठी दर १ कि.मी. अंतरावर आपत्कालीन कम्युनिकेशन (ईएमसी) बसवण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 07/Jun/2025