संगमेश्वर : आरवलीचे पोलिसपाटील पद अद्याप रिक्तच

सावर्डे : पोलिसपाटील यांची ग्रामस्तरीय सुरक्षितता राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. तो नसेल तर गावातील कायदा सुव्यवस्था, प्रशासकीय कार्ये आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. मुंबई-गोवा महामार्गावरील तीन हजार लोकसंख्या व १९ वाड्या असलेल्या आरवली (ता. संगमेश्वर) गावचे पोलिस पाटील हे पद आदिवासी भटकी जमात या प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गाची व्यक्ती गावात नसल्याने हे पद दोन वर्षापासून भरले नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामसभा, सरकारी योजना, सर्वेक्षण, निवडणुका इत्यादींसाठी पोलिस पाटलाची आवश्यकता असते. पोलिस पाटील हा तलाठी, सरपंच व पोलिस ठाणे यांच्यामधील दुवा असतो. तो नसल्यामुळे समन्वय कमी होत आहे. रहिवासी दाखले, पोलिस ठाणेला अहवाल देणे अशा बाबतीत पोलिस पाटलाची सही व उपस्थिती गरजेची असते. आपत्ती, नैसर्गिक संकटे, चोरी, अपघात, अतिरेकी घटना यामध्ये त्वरित उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पोलिस पाटील उपयुक्त ठरतो; मात्र तालुका प्रशासनाने दोन वर्षापासून पोलिस पाटील हे पद भरले नसल्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

पोलिसपाटलाचा तात्पुरता पदभार मुरडव गावच्या पोलिस पाटलाकडे दिला आहे. मात्र, त्यांचे सहकार्य मिळत नाही. गावातील प्रशासकीय वा कायदा सुव्यवस्थादृष्टीने होणाऱ्या बैठकांना ते हजर राहात नाहीत. ते असून नसल्यासारखे आहेत. ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पोलिसपाटील पदासाठी आरक्षित प्रवर्गाची व्यक्ती गावात नसल्याने आता पुढील आरक्षणापर्यंत वाट पाहावी लागणार आहे- नीलेश भुवड, सरपंच आरवली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 09/Jun/2025