रत्नागिरी : शासनाचा आदेश धाब्यावर बसवून जिंदल कंपनीने गॅस टर्मिनलचे काम सुरूच ठेवले आहे. कंपनीच्या भूमिकेमुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आणि काल दुपारी हे काम बंद पाडले. याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी गोंधळ घालत काम बंद पाडले. बंदर अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शासनाचा पुढील लेखी आदेश येत नाही, तोवर काम बंद ठेवावे लागेल, असे स्पष्ट केल्यामुळे संबंधित कामगारांनी काम बंद ठेवले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासह महाराष्ट्र सागरी मंडळ, जयगड यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
एलपीजी गॅस टर्मिनल उभारण्याच्या कामाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. यापूर्वी झालेल्या वायूगळतीमुळे सुमारे ८० मुलांना बाधा झाली होती. त्यामुळे या गॅस टर्मिनलबाबत स्थानिकांच्या मनात भीती आहे. त्यात कंपनीकडूनही सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना होताना किंवा कंपनी स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करताना दिसत नाही. त्यामुळे हा विरोध वाढतच आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी गॅस टर्मिनलचे काम तत्काळ थांबवले आहे.
तरीदेखील आज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याचे धाडस केले. जिंदल कंपनीचा मनमानी कारभार आणि सरकार आमच्या खिशात आहे, अशा अविर्भावात वागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. स्थानिकांचा याला विरोध आहे. शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी नसताना जिंदल कंपनी मनमानी करून नांदिवडेच्या माथ्यावर लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत
आहे.
जिंदल कंपनीच्या कोळशाची धूळ आणि राख याचा स्थानिक लोकांना त्रास होत आहे. काल नांदिवडे आणि जयगड परिसरामध्ये आजार बळावले आहेत. एवढा त्रास असूनदेखील कंपनी गावामध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. प्रदूषण विभाग, जिल्हाधिकारी, सागरी मंडळ, पेसो या सर्व विभागांची परवानगी नाही तरी कंपनी हा प्रकल्प रेटत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
स्थानिक मच्छीमार नाराज
कंपनी कोणाच्या जीवावर मनमानी कारभार करत आहे, याचा उलगडा झाला पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली. कंपनीच्या या भूमिकेमुळे सर्व शेतकरी, स्थानिक मच्छीमार कंपनी, प्रशासनावर नाराज आहेत. शासनाने या विरोधाची दखल घेत लवकरात लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतर करावा आणि जिंदल कंपनीवर कारवाई करा, अशी सर्व शेतकरी आणि मच्छीमारांची या वेळी मागणी आहे.
जिंदल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम १७ मे रोजी बंद करण्याचे आदेश सागरी महामंडळाने दिले आहेत. कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना कंपनी कोणाच्या जीवावर एवढे धाडस करत आहे, हे आम्हा लाही समजायला हवे; परंतु त्यांचा हा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळेच काम बंद पाडले. याबाबत जयगड पोलिस ठाणे आणि सागरी महामंळाकडे तक्रार केली आहे- गुरुनाथ सुर्वे, माजी सरपंच, नांदिवडे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 12/Jun/2025














