चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघात टाळण्यासाठी कशेडी ते बावनदी या १७० किलोमीटरच्या अंतरावर महामार्ग पोलिसांची २४ तास गस्त (पेट्रोलिंग) सुरू झाली आहे. पावसाळ्यात महामार्ग पोलिसांचे घाटरस्त्यावर असणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी ते राजापूरपर्यंतचा मार्ग हा डोंगराळ वळणाचा असल्यामुळे धोकादायक मानला जातो. पावसात महामार्गांवर दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता निसरडा होणे, खड्डे पडणे या समस्या हमखास उद्भवतात. परिणामी, अपघाताच्या घटना घडून नाहक जीव जातात. अनेकांवर गंभीर जखमी होण्याचे संकट कोसळते. यावर्षीच्या पावसाळ्यात तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महामार्ग विभागाने आधीच काळजी घेऊन संबंधित शासकीय कार्यालय आणि महामार्गाचे काम करणाऱ्या एजन्सीला पत्रव्यवहार केला आहे. चालकांनी विशेष काळजी घ्यावी यासाठी त्यांचेही प्रबोधन सुरू आहे.
याबाबत माहिती देताना महामार्ग विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अनंत पवार म्हणाले, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनासाठी रुग्णवाहिका, जेसीबी, हायड्रा क्रेन, पुरेसे कर्मचारीवर्ग आदींची व्यवस्था २४ तास उपलब्ध असावी, अशी सूचना आम्ही महामार्ग विभागाला केली आहे. आवश्यक त्या ठिकाणी साईडपट्टी, पेंटाईज, पॅनकॉर मिरर, वेगमर्यादा दर्शवणारे फलक तसेच वाहतूक वळवलेल्या ठिकाणी डायव्हर्जनचे बोर्ड लावण्याची सूचना केली आहे. ब्लॉकस्पॉट, अपघातांच्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ऑईल गळतीवर उपाययोजना म्हणून डस्ट ठेवावे. ज्या ठिकाणी पुलांची कामे अपूर्ण आहेत ती पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नसल्यास सेवारस्ते व्यवस्थित करून घ्यावेत. पूल, नद्यांचे पूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच महामार्गालगत असलेल्या नाल्यांची सफाई करून घ्यावी.
महामार्गावरील वाळलेली झाडे तसेच वाढलेल्या झाडांच्या फांद्याची कटिंग करून घ्यावी. महामार्गावर ज्या ठिकाणी पाणी साचून राहते तिथे पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच पाणी साचल्याने महामार्ग बंद झाल्यास किंवा एखादा अपघात झाल्यास त्याबाबतची माहिती महामार्ग विभागाला देण्यात यावी म्हणजे वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे पवार यांनी सांगितले.
कशेडी आणि परशुराम घाटात पावसाळ्यात नेहमी अपघात होतात. यावर्षी होऊ नये यासाठी आम्ही कल्याण टोलवेज कंपनीकडे पत्रव्यवहार करून आवश्यक त्या उपाययोजना करून घेत आहोत. अपघात झाला तरी आपत्कालीन यंत्रणा तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी तयारी केली आहे. महामार्गावर कुठेही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास वाहनचालक आणि नागरिकांनी प्रशासन आणि महामार्ग पोलिसांशी संपर्क साधावा-अनंत पवार,उपनिरीक्षक, महामार्ग पोलिस लोटे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 13/Jun/2025














