रत्नागिरी : जिल्ह्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या; मात्र काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या तिळाच्या शेतीसाठी कोकण कृषी विद्यापीठाने कंबर कसली आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘कारळा’ या तिळाच्या वाणाचे खरीप हंगामासाठी ५० किलो बियाणे वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तिळाच्या शेतीतून उत्पन्न मिळू शकणार आहे तसेच आंबा, काजू बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून कारळा तिळाचे पीक घेता येणार असल्याची माहिती शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.
जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या तरी त्यांची उत्पादकता कमी आहे. पारंपरिक तिळाची उत्पादकता कमी असल्याने हे पीक दुर्लक्षित झाले. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून तिळाची आवक होते. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने कारळा तिळावर संशोधन केले. त्या द्वारे नवीन वाण विकसित केले आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे तिळावरील पहिलेच संशोधन आहे. विद्यापीठाने तयार केलेले हे वाण हेक्टरी ४५० ते ५०० किलो उत्पादन देणार आहे. जिल्ह्यात तीळ लागवडीचे क्षेत्र अवघे ०.२० हेक्टर इतकेच होते. खरीप हंगामात जिल्ह्यात भात मुख्य तर नागली, नाचणीचे दुय्यम पीक घेतले जाते. पडीक, वरकस, पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेत तिळाचे पीक उत्तम येते. पारंपरिक वाणामुळे उत्पादकता कमी असल्याने २०१४-१५ पासून कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात यावर संशोधन सुरू होते. नाशिक, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील तिळाच्या जाती एकत्र करून संशोधन करण्यात आले. संशोधन पूर्ण होऊन कारळाचे नवीन वाण विकसित करण्यात यश आले आहे.
मधमाश्यांमुळे उत्पादकता वाढण्यास मदत
कमी पाण्यात कमी दिवसात हे पीक तयार होते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वाणाची चाचणी सुरू आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून मागणी जास्त होत आहे. आंबा, काजू, बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून कारळा तिळाचे पीक घेता येणार आहे. कारण, या तीळ शेतीवर मधमाश्यांचा वावर मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळे बागायती शेतीत फळ उत्पादकता वाढण्यासही मदत होते
शेतकऱ्यांकडूनही तिळाच्या वाणासाठी केली जात असलेली मागणी लक्षात घेता विद्यापीठाचे संशोधन पूर्ण होऊन हे नवे वाण विकसित करण्यात आले आहे. ऑगस्टच्या शेवटी लागवड केली तरी तीन महिन्यात पीक तयार होते. विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पिकासाठी कमी दिवस श्रम, वेळ व पैसा कमी लागतो. तिळातील तेलाचे प्रमाण ४२ टक्के आहे. ३५ ते ४० दिवसात फुलोरा येऊन ९० दिवसांत पीक तयार होते-डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र शिरगाव
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 13/Jun/2025














