आडिवरे जलमय : ढगफुटीसदृश्य पावसाने ४० वर्षांतील उच्चांक गाठला

राजापूर : राजापूर तालुक्यातील आडिवरे गावात काल सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. सायंकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत अवघ्या चार तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आडिवरे येथील प्रसिद्ध महाकाली मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

या अतिवृष्टीमुळे आडिवरे गावातील मुख्य रस्त्यावर सुमारे १० फूट पाणी जमा झाले होते. रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानांमध्येही सुमारे ७ फूट पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या वडापावच्या गाड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आडिवरे महाकाली मंदिर संस्थेचे अध्यक्ष प्रसाद शेट्ये यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गेल्या चाळीस वर्षांत अशी परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती.” यापूर्वी नदीतील गाळ काढल्यामुळे रस्त्यावर पाणी भरण्याची समस्या कमी झाली होती, परंतु कालच्या तीन तासांच्या ढगफुटीसदृश्य पावसाने आडिवरे पूर्णपणे जलमय झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अचानक आलेल्या या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 14-06-2025