चिपळूण : कोकणातील चिपळूणमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. येथील परशूराम घाटावर गेल्या महिनाभरापासून संरक्षण भींतीचे काम सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने येथील प्रवास आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे.
येथील डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती व्यक्त होतआहे.
पाण्याच्या प्रवाहात गॅबियन बॉलच्या आजूबाजूची मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊ लागल्यामुळे उर्वरित भराव वाहून जाण्याची भीती आहे.
मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटातील समस्येवर उपाययोजना करण्यात हाय वे प्रशासन फोल ठरत आहे. येथील काम प्रगतीपथावर असलं तरी परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, परशूराम घाट आणि मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल कोकणवासीय नेहमीच विचारत असतात. आता, या संरक्षण भींतीच्या दुर्घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्राला आणि कोकणला जोडणाऱ्या कराड-चिपळूण महामार्गावर बसचा अपघात झाला आहे. महामार्गाच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने महामार्गावरील खड्डे चुकवत असताना हा अपघात झाला आहे.

एसटी बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक होऊन एसटी नाल्यात गेली असून या अपघातात 8 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मोठ्या प्रमाणावर एसटी बसचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:42 16-06-2025














