Rohini Khadse : हिंदीला दिली ओसरी अन् हातपाय पसरी, हिंदीला देण्यात येणारं प्रोत्साहन वेळीच थांबवा; रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

Rohini Khadse : राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदीचे प्रोत्साहन वेळीच थांबले पाहिजे नाहीतर ‘हिंदीला दिली ओसरी हिंदी हातपाय पसरी’ असं आपल्या सोबत व्हायचं असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ त्यात एक ओळ आहे. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी… आपुल्या घरात हाल सोसते मराठी…ही ओळ कालच्या जीआरला शोभणारी आहे असं खडसे म्हणाल्या.

शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलाय. मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल, असा अध्यादेश समोर आणला. यावरुन रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे.

पहिलीपासून तिसऱ्या भाषेला जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर हिंदीची सक्ती मागे घेण्यात आली होती. पण काल का कुणास ठाऊक पुन्हा तिसरी भाषा म्हणून हिंदीचा जीआर काढण्यात आला. आपल्या राज्यात मराठी भाषेचे प्रचंड हाल आहेत, शाळा वाचवण्यासाठी कोणते अनुदान नाही की धोरण नाही पण हिंदीला मात्र प्रोत्साहन दिले जात आहे. हे वेळीच थांबले पाहिजे नाहीतर, ‘हिंदीला दिली ओसरी हिंदी हातपाय पसरी’ असं आपल्या सोबत व्हायचं अशी भीती रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.

राज ठाकरेंचीही टीका

जी भाषा सक्तीची नाही जीचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका. सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू. आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? गुजरात सरकारचा जीआर आहे पहिलीपासून गुजराती, गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील बंधू भगिनी शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे. लेखक, साहित्यिक, कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. मराठी संपवून हे टाकतील. शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू… सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावं. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का?

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 18-06-2025