मंडणगड : लाटवण-विसापूर मार्गावरील पुलाच्या कामाचा विन्हे गावतील ग्रामस्थांना फटका

मंडणगड : तालुक्यातील लाटवण-विसापूर मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यक्षेत्रात भरपावसात सुरू असलेल्या पुलांच्या कामामुळे विन्हे गावचे जनजीवन गेल्या पंधरा दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. तसेच येथील ओढ्याचे पाणी चुकीच्या मार्गाने फिरवल्यामुळे चाळीस एकरातील भातशेती नष्ट झाली आहे. शेतकऱ्यांवर यंदा शेतीअभावी वर्षे घालवण्याची नामुष्की ओढवली आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विन्हे गावातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील अवजड वाहतूक बंद करून गेले पंधरा दिवस या मार्गावरील पुलाचे काम केले जात आहे. त्यामुळे या कालावधीत विन्हे येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले. एसटी वाहतूक बंद राहिल्यामुळे सुमारे चार कि. मी. ची पायपीट येथील ग्रामस्थांना करावी लागली, बँकिंग, दवाखाना, बाजार इत्यादी सर्व कामांसाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा त्यागला. ठेकदार व बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीचा नाहक फटका येथील नागरिकांना सहन करावा लागला. या निमित्ताने विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. महामार्गावर काम करताना वाहतूक बंद करण्याच्या नवीन कार्यपद्धतीचा सार्वजनिक बांधकाम विभागाने शोध लावला आहे का, तसा अधिकार बांधकाम विभागाला कोणी दिला, असे अनेक प्रश्न या निमिताने चर्चेत आले आहेत.

पावसात काम करण्याच्या अट्टाहासामुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढत आहेत. कामाचा हंगाम संपला, तरीही घाईघाईने होणारे कामाचे नियोजन फसले असून, पावसात केलेल्या पुलाच्या कामाचा फज्जा उडाला आहे. मंडणगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विचित्र कार्यपद्धतीमुळे नागरिकांना त्रास झाला आहे. येथील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड लाटवण-दापोली या राज्यमार्गातील लाटवण ते विसापूर या अंतरातील रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरणाच्या कामाचा ठेका महाड येथील ठेकेदाराकडे आहे. पावसात ठेकेदाराने काम सुरू ठेवल्यामुळे पंधरा दिवस मोठ्या वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कोंडविलकर यांना संपर्क केला असता याबाबत सविस्तर उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

पाणी वळवल्याने पेरणी केलेली शेती पूर्ण पाण्याखाली जाऊन नष्ट झाली आहे. वाहतूक बंद झाल्याने विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत. वैद्यकीय उपचार वेळेत मिळण्यास अडथळा निर्माण झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून या सर्व गोष्टींचा त्रास होत असून, याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार एजन्सी आहे- संभाजी गायकवाड ग्रामस्थ, विन्हे

एकाच रस्त्यावर खर्च
मंडणगडमधील बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा होऊ लागली आहे. कामांत अनेकवेळा गुणवत्ता व संबंधित कामांचे करण्यात येणारे अंदाजपत्रक याबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित केल्या जातात. या विभागाच्या वतीने पूल व रस्तेविकासासाठी वर्षभरात करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो; मात्र त्याच त्याच रस्त्याच्या लांबीमध्ये मोठ्या निधीचा खर्च करणाऱ्या या विभागाला नावीन्यपूर्ण विकासकाम साध्य करता आले नाही. एएमसीअंतर्गत खड्डे बुजवण्याची कामे ही त्याच त्याच रस्ते लांबीमध्ये केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 19/Jun/2025