रत्नागिरी : पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी होणार आहेत. रत्नागिरी ते पंढरपूर हा ३०० किमीचा प्रवास दोन दिवसांत हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत.
पंढरपूरला लाखो वारकरी आषाढी एकादशीला एकत्र येतात. विठुरायाच्या दर्शनासाठी हे वारकरी वारीतून तेथे पोहोचतात. त्याच धर्तीवर गेल्या काही वर्षांपासून सायकल वारीचेही आयोजन केले जाते. यावर्षी रत्नागिरीतूनही सायकल वारी निघणार आहे. शुक्रवार, २० जून रोजी माळ नाका येथील विठ्ठलाच्या विराट मूर्तीचे दर्शन घेऊन वारीला सुरवात होऊन ते २१ जूनला पंढरपूरला पोहोचतील. २२ जूनला भागवत एकादशीच्या दिवशी तेथे राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा, संमेलन करणार आहेत.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, दर्शन जाधव, अमित पोटफोडे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे, आरती दामले, अनुप मेंहदळे, ओंकार फडके वारीमध्ये सहभागी होणार आहेत.
सायकलवारीची संकल्पना नाशिक सायकल क्लबने सुरू केली. त्यांचे ४०० सदस्य सायकल चालवत नाशिकहून पंढरपूरला जात असत. त्यातूनच पुढे या सायकलवारीचा प्रारंभ झाला. सायकलवारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी सायकल वारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लबने केले होते. दुसऱ्या वर्षी नाशिक, तिसऱ्या वर्षी बारामती व यंदा लातूर सायकल क्लब करत आहे.
प्रत्येक वर्षी पंढरपूर सायकल क्लब सर्व सायकलिस्टना सहकार्य करत आहे. २१ जूनला सर्व सायकलस्वार पंढरपूरला पोहोचतील व २२ जूनला सकाळी सहा वाजता नगर प्रदक्षिणा, सायकल रिंगण होईल. त्यानंतर प्रत्येक सायकल क्लबतर्फे चर्चा कार्यक्रम होईल. विशेष कार्य करणाऱ्या क्लबचा सत्कार करण्यात येऊन सायकल क्लबला सन्मानपत्र दिले जाईल. महाप्रसादानंतर सांगता होईल.
रत्नागिरीतील माळनाका येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन २० जूनला पहाटे ५.३० वाजता सायकलवारीला सुरवात झाली हातखंबा, पाली, साखरपा, मलकापूर, कोकरूड, शेडगेवाडी, कराडमार्गे उंब्रज येथे पहिला मुक्काम होईल. २१ जूनला उंब्रज येथून पुढच्या प्रवासाला सुरवात होईल. त्यानंतर मसूर, पुसेसावळी, मायणी, दिघंजी, महूद, पंढरपूर मुक्काम. २२ ला भागवत एकादशी असून, नगर प्रदक्षिणा, सायकलस्वारांचे रिंगण होईल.
या वारीबाबत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकलिस्ट विशाल भोसले यांनी सांगितले की, मी गेल्या वर्षीसुद्धा सायकलवारीत सहभागी झालो होतो. ४८ सायकल ग्रुपमधून १५०० सायकलिस्ट पंढरपूरला गेले होते. यंदा साधारण ९० हून अधिक ग्रुप आणि २५०० सायकलिस्ट होण्याचा अंदाज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 20-06-2025














