रत्नागिरी : लांजा राजापूर या विधानसभा मतदारसंघात सुमारे २६ धरणांची कामे होणार आहेत; परंतु या धरणांच्या कामासाठी भूसंपादन शून्य आहे. यासाठी सुमारे ९०० कोटी निधी लागणार आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये हा निधी मिळण्यासाठी प्रयत्न आहे. माचाळच्या पर्यटन विकासासाठी १० कोटींचा मंजूर आहेत; परंतु तेथे शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने पायाभूत सविधांची कामे थांबली आहेत; परंतु लवकरच त्यावर पर्याय काढून विकास साधला जाईल, अशी माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. किरण सामंत म्हणाले, राजापूर पूररेषेसंदर्भात चर्चा झाली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी पूररेषा होती तीच ठेवली आहे. पूररेषेचा फेर सर्व्हे झाला, तरी रेषा तशीच राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लांजा येथील डम्पिंग ग्राऊंडचा विषय काही ठराविक लोकांच्या विरोधामुळे जास्त चिघळला आहे. त्यांनी किती पटवून सांगितले तरी ते ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत.
नद्यांवर पूल बांधणार
लांजा-राजापूर तालुका सह्याद्रीच्या पायथ्यापासून ते समुद्राला मिळाला आहे. अनेक ठिकाणी दुर्गम भाग आहे. अर्जुना, मुचकुंदी, काजळी या तीन नद्या असून, त्यामुळे मतदारसंघाचे चार भाग पडले आहेत. ही गावे जोडण्यासाठी नद्यांवर पूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 25/Jun/2025














