चिपळूण : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. सतत बदल होत आहेत. या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना भविष्यात नेमकी कशाची निकड भासणार आहे, याची माहिती घेऊन क्षेत्र निवडावीत. त्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची तयारी असायला हवी, असे प्रतिपादन सह्याद्री पॉलिटेक्निकचे सावर्डे येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी दिनेश खानविलकर यांनी केले.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीतर्फे आयोजित दहावी, बारावी, पदवी व पदवीत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम रविवारी संस्थेच्या चिपळूण येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात झाला. या वेळी संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत व शिक्षण समितीचे अध्यक्ष विलास सकपाळ उपस्थित होते. या वेळी १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या कामात अत्यंत सक्रिय असणाऱ्या आणि शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या काही मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. त्यात दिलीप मोहिते (पोफळी), संजय मोहिते (पेढांबे), मधुकर मोहिते (पेढांबे), जगदीश कांबळे (नांदगाव), अरूण जाधव (वडेरू), विलास गमरे (बामणोली), प्रभाकर सकपाळ (चिपळूण) यांचा समावेश होता.
या प्रसंगी प्रा. खानविलकर म्हणाले, बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडले पाहिजे. आता विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा पर्याय उपलब्ध आहे. शासनाच्या अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे गरिबीमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये. त्यासाठी पुरेपूर माहिती जाणकार मंडळींकडून घेतली पाहिजे. शिक्षकांकडून माहिती मिळवली पाहिजे आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सकपाळ यांनी केले, तर या वेळी संस्थेचे माजी सरचिटणीस रमाकांत सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, राजहंस पतसंस्थेचे संचालक सुनील गमरे, कुटरे विभागाचे अध्यक्ष प्रकाश कदम, २७ गाव विभागाचे अध्यक्ष सुधाकर पवार, वहाळ विभागाचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 25/Jun/2025














