राजापूर : राजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर साधे कूळ म्हणून दाखल होत आहेत. त्यामुळे पीएम किसान योजनेसह अन्य योजनांतील लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. शासन विविध लोकोपयोगी योजना राबवत असताना गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो का? हा संशोधनाचा विषय झाला आहे. याबाबत राजापूरमधील धोपेश्वर येथील श्री धूतपापेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीतर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राजापुरातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
धूतपापेश्वर सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील धोपेश्वर, पन्हळेतर्फे राजापूर, बाग काझी हुसैन, बाग अ. कादीर, बारसू, तिठवली, हर्डी पाथर्डे, केळवडे, कोदवली मांडवकरवाडी, गोवळ, खालचीवाडी गोवळ, वरचीवाडी गोवळ व शिवणेखुर्द या गावातील शेतकरी सभासदांना खरीप व रब्बी हंगामात आंबा, काजू, भातपीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम संस्था पातळीवर सुरू आहे. २०२३-२४ पासून शासनाच्या धोरणात झालेल्या बदलांमुळे कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे.
शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे; पण प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत. कोकणातील बहुसंख्य शेतकरी साधे कूळ आहेत. त्यांना कर्ज घ्यायचे असेल तर इतर हिस्सेदारांची, भोगवटदारांची संमती असल्याशिवाय कर्ज मिळत नाही. पीएम किसान योजनेचा लाभ केवळ भोगवटादार नाव असलेल्यांना मिळतो; मात्र प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची नावे सातबारावर कुळांमध्ये असल्याने त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे ही योजना भोगवटादारांकरिताच केली आहे काय? असा प्रश्न संस्थेने पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
यापूर्वीही संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याची आजपर्यंत कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करत याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कुळांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, अशी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 25/Jun/2025














