राजापूर : तालुक्यातील रेल्वेस्टेशन रस्त्यावरील दोनिवडे येथील थांब्यानजीक असलेले जुनाट वडाचे झाड कोलमडून पडल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. येथील तरुणांनी घेतलल्या दक्षतेमुळे अघटित घटना टळली; मात्र रेल्वेस्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक ठप्प झाल्याने खूप त्रास सहन करावा लागला.
दोनिवडे येथील थांब्याजवळील जुनाट वडाचे झाड मोडकळीस आले होते, गेले दोन दिवस जोरदार वारा आणि पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता. २४) दुपारी झाडामधून करकर असा आवाज येत होता. त्यामुळे हे झाड पडणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना याची कल्पना दिली जात होती. यामुळे वाहनधारक सावध होत होते. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागालाही देण्यात आली होती. त्या वेळी त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फक्त दोनवेळा पाहणी केली; मात्र कोणतीही उपाययोजना केली नाही. दरम्यान, हे झाड संध्याकाळी रस्त्यावरच आडवे पडले.
येथील तरुणांनी वाहनधारकांना सावध केल्याने अघटित घटना टळली. यानंतरही बांधकाम विभागाने दोन कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने पाहणीसाठी पाठवले. रेल्वेस्टेशनला जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर कायम वर्दळ असते. त्यामुळे झाड हटवण्याची कार्यवाही त्वरित होणे गरजेचे होते. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला, अखेर येथील तरुणांनी व उपसरपंच जितेंद्र
शिरवडकर यांनी खासगी यंत्रसामुगी आणून रस्त्यावर पडलेले झाड रात्री अकरा वाजता दूर केले.
रेल्वेस्टेशन रस्त्यावर झाड पडल्याने रेल्वेस्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कोंडये व गोठणे दोनिवडेमार्गे काही प्रवासांनी रेल्वेस्टेशन गाउले; मात्र त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 27/Jun/2025














