रत्नागिरी : मावळंगेत एका बैलाच्या साह्याने विष्णू लिंगायत यांनी केली नांगरणी

पावस : सध्या बैलजोडी पाळून भातशेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेकजण भातशेती करणे सोडत आहेत; पण मावळंगे (ता. रत्नागिरी) येथील उमाकांत दत्ताराम तथा विष्णू लिंगायत यांनी पारंपरिक भातशेती करताना एका बैलाच्या साह्याने शेतजमीन नांगरण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

कोकणात पूर्वी भातशेती अनेक कुटुंबांसाठी उदरनिर्वाहाचे साधन होते. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे या गोष्टीला चांगली गती मिळत होती; परंतु एकत्र कुटुंबपद्धती कमी झाल्याने भातशेतीच्या कामांमध्ये अनेकांचा रस कमी झाला आणि भातशेती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण पुढे केले जाऊ लागले. त्यामुळे अनेक भातशेतीच्या जागा ओस पडू लागल्या आहेत. अनेक शेतकरी पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत; मात्र काहीजण पशुधनाचा वापर करूनच भातशेती करताना दिसत आहेत. त्यामध्ये मावळगे येथील जुने शेतकरी उमाकांत दत्ताराम तथा विष्णू लिंगायत यांनी गेली अनेक वर्षे पारंपरिक बैलजोडीच्या माध्यमातून भातशेती करत आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी भातशेतीकडे विशेष लक्ष दिले आहे.

याबाबत लिंगायत म्हणाले, ‘पहिले आमच्याकडे बैलजोडी होती; परंतु त्यातील एक बैल कमी झाला. त्यामुळे शेतीचं कसं होणार, हा प्रश्न होता; परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये भातशेती करायचीच असे ठरवलं आणि एका बैलाच्या साह्याने संपूर्ण शेतजमीन नांगरली. त्यासाठी एका बैलासाठीचे जोत (नांगर) तयार केले. लाकडापासूनचा नांगर बनवता आला नाही; परंतु लोखंडी पाईपच्या साह्याने साचा तयार बनवून नांगर बनवला. त्या माध्यमातून नांगरणी करून केली. भाताची पेरणीही झाली असून, एका बैलाच्या साह्याने शेतीचा प्रयत्न यशस्वी केला आहे. त्यामुळे भविष्यात बैलजोडी सांभाळण्याचे कारण कोणीही पुढे करू नये,’ असा संदेश त्यांनी दिला.

आम्ही पारंपरिक पद्धतीने भातशेती करतो. हेच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेतीसाठी आमच्याकडे असलेल्या पशुधनाचा उपयोग करतो. त्यामुळे यंत्राचा वापर केलेला नाही. शेतात शेणाच्या साह्याने चांगले खतही मिळते- विष्णू लिंगायत, मावळंगे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 27/Jun/2025