‘मतदार योग्य उत्तर देतील…’, EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांचे उत्तर

मुंबई : निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. या दोन राज्यांसोबतच इतर 13 राज्यांतील पोटनिवडणुकीची घोषणाही आज केली जाणार आहे. दरम्यान, निवडणूक तारखांच्या घोषणेपूर्वी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी EVM वर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले.

राजीव कुमार म्हणाले की, ईव्हीएम योग्य असल्याचे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. ईव्हीएम 100 टक्के निर्दोष आहेत. जनता मतदानात सहभागी होऊन प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना योग्य उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ईव्हीएमवर कुणी प्रश्न उपस्थित केला?
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पवन खेडा आणि जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएममधील त्रुटी सांगितल्या. याप्रकरणी त्यांनी मशीनच्या बॅटरीवर प्रश्न उपस्थित करत तक्रारही केली. यानंतर राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी (11 ऑक्टोबर) ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. सध्याच्या ईव्हीएम व्यवस्थेमुळे मतदार म्हणून त्यांचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे ते म्हणाले. पोस्टल बॅलेटच्या मोजणीनुसार मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने बहुतांश जागा जिंकल्याचा दावाही त्यांनी केला.

बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी
काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ते मंगळवारी (15 ऑक्टोबर 2024) म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधकांनी ईव्हीएमऐवजी कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान करण्याचा आग्रह धरला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील भाजप सरकार आणि निवडणूक आयोग काहीही करू शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 15-10-2024