Prithviraj Chavan: केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणावरचा खर्च कमी केला आहे हा मूलभूत मुद्दा आहे. आपण किती भाषा ठेवा पण शिकवायला मूलभूत सामग्री नाही. शिक्षणाची दुर्दशा झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला भाषेचा मुद्दा काढत आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे.
मनसे आणि शिवसेनेच्या वतीने काढल्या जाणाऱ्या मोर्चात सहभागी व्हायचे का नाही याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष आणि नेते ठरवतील, असेही त्यांनी म्हटले आहे. प्राथमिक शिक्षण असो माध्यमिक शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असेल त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज असून बाकीचे सर्व निरर्थक वाद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इंग्रजीला बाजूला करा, स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करा
ते पुढे म्हणाले की, हिंदी ही राजभाषा आहे. देशाला लिंक लँग्वेज म्हणून हिंदी भाषेचा वापर होतो. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे. इंग्रजीमध्ये जेवढं नवीन संशोधन होत आहे ते इतर कोणत्याही भाषेत होत नाही. राज्यकर्त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे इंग्रजीला बाजूला करा आणि स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करा. यासाठी एक एक प्रयत्न चालवले असल्याने हा गदारोळ उठला असल्याची टीका त्यांनी केली. विद्यमान शासन मराठीला विरोध करू शकणार नाही, पण ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण राबवले जात आहे त्यामुळे गदारोळ उठला असल्याचे म्हणाले.राज्यकर्त्यांना एकच भाषा ठेवायची आहे ती म्हणजे हिंदी. हे मुळात चुकीचे धोरण आहे. तीन भाषेचा धोरण आपण पूर्वीपासून स्वीकारले आहे, त्यामुळे हिंदी सक्ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडं शिक्षक नाहीत, पुस्तके नाहीत असं असताना भाषा वाढवण्याचा आग्रह धरला जात असल्याचे ते म्हणाले.
पण मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना
ते पुढे म्हणाले की, सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे ही राज ठाकरे यांची पॉलिटिकल ॲक्शन आहे. कसा मोर्चा काढायचा हा त्यांचा भाग आहे, पण मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना आहे. ती कशाप्रकारे मांडायचे हे आम्ही ठरवू. मोर्चामुळे ते (राज आणि उद्धव) एकत्र येत आहेत असं काही नाही. ही चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर त्यांची ही चर्चा सुरू आहे. दोघांची संख्या वाढेल या दृष्टीने त्यांची चर्चा आहे.. घरातील वाद, भांडण मिटत असतील तर ही आनंदाची बाब आहे, पण आमची महाविकास आघाडी आहे त्याचे घटक पक्ष उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी कोणाबरोबर युती करावी हा त्यांचा भाग आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 27-06-2025














