मंडणगड : तालुक्यातील टाकेडे गावातील सात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती केली आहे. भातलावणीचा हंगाम सुरू झाला असून, पारंपरिक गाणी गाऊन शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धतीच्या भात लागवडीचा आनंद लुटला.

रोजगारासाठी स्थलांतरामुळे कमी झालेले मनुष्यबळ आणि वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून एकटा शेतकरी शेती करेनासा झाला. त्याच्यावर उपाय म्हणून गावातील सेवानिवृत्त शिक्षक अनंत शिंदे गुरुजी यांनी शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्त्व पटवून दिले. माजी सभापती अमिता शिंदे यांच्या पुढाकाराने गावातील सातजणांचा एक गट तयार करण्यात आला. कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी राकेश मर्चेंडे, कृषी विस्तार अधिकारी पवन गोसावी, सहायक कृषी अधिकारी बालाजी नागरगोजे, वैभव सीतापुरे यांना या उपक्रमाची माहिती देण्यात आली. या सर्वांनी या गटाला प्रोत्साहन दिले.
कृषी खात्यामार्फत रत्नागिरी ८ हे भातबियाणे मोफत पुरवले. गावात चारसूत्री भातपद्धतीची कार्यशाळा घेतली. लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सर्व अधिकारी सदाशिव कदम यांच्या शेतात उपस्थित राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा हुरूप वाढला आहे. लावणी करताना मोहन शेलार, अनिल गणवे व सर्व उपस्थित मंडळींनी निसर्गाशी एकरूप होणारी पारंपरिक गीते गायली. नूतन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका पाडलेकर, पदवीधर शिक्षक अशोक सुर्वे, राठोड, पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांसमवेत भातलावणीचा आनंद लुटला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 30/Jun/2025














